७०० कोटींच्या चेकमधले नको असलेले ६३० कोटी परत करणारे शिवशंकरभाऊ…

मुळचे बुलढाण्याचे असणारे विक्रम पंडित तेव्हा सिटी बॅंकेचे चेअरमन होते. त्यांना भाऊंचं काम माहित होतं. ते भाऊंनां म्हणाले या कामासाठी किती पैसे हवेत. बॅकेच्या मार्फत ७०० कोटींचा चेक देण्यात आला. विश्वस्त मंडळाने आराखडा तयार केला. किती खर्च येईल याचा हिशोब करण्यात आला. हिशोब लागला ७० कोटींचा. संस्थानला ७० कोटींची आवश्यकता होती. ७० कोटी वापरण्यात आले आणि ६३० कोटी परत करण्यात आले.
हे संस्थान महाराष्ट्रातलं अन् ६३० कोटींचा चेक परत करणारे ते व्यक्ती म्हणजे शेगांव संस्थानचे प्रमुख प.पू. शिवशंकरभाऊ पाटील.
श्री गजानन महाराज २३ फेब्रुवारी १८७८ रोजी शेगाव येथे प्रकटले. ८ सप्टेंबर १९१० रोजी ते समाधीस्थ झाले. त्यांच्या हयातीतच, १९०८ मध्ये श्री गजानन महाराज संस्थान नावाचा ट्रस्ट स्थापन करण्यात आला. ट्रस्टचे विश्वस्त म्हणून बारा विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आली.
यात्रा थांबू देवू नका, पैसा साठू देऊ नका, निसिम्म भावनेने सेवा करा या तत्वांवर ट्रस्टचा कारभार सुरू करण्यात आला.
या संस्थानची सुत्रे पुढील काळात शिवशंकर भाऊ पाटील यांच्या हातात आली. त्या काळात संस्थानची वार्षिक उलाढाल ४५ लाख होती. भाऊंनी संस्थानमध्ये कामे करण्यास सुरवात केली. आणि काही वर्षांत संस्थानची वार्षिक उलाढाल हि शिवशंकर भाऊंनी १३७ कोटींच्या घरात नेऊन ठेवली.
पण या कोटींच्या व्यवहारात शिवशंकर भाऊंच्या कामांची किंमत करता येणार नाही, कारण आजतागायत संस्थानचा चहाच काय पाणी देखील शिवशंकर भाऊंनी प्यालेला नाही. ते मंदिर परिसरात असतात तेव्हा आपलं पाणी देखील घरातून आणतात.
आलेला पैसा साचू द्यायचा नाही या विचारातून शिवशंकरभाऊंच्या माध्यमातून मंदिर परिसराचा कायापालट करण्यात आला. आज शेगांव संस्थानबद्दल सांगायचं झालं तर इथे सर्वात देखणं आणि तितकच नावाजलेलं अस इंजिनियरिंग कॉलेज आहे, भक्तनिवासाची सोय कौतुकास पात्र अशी आहे आणि आनंदसागर सारखा ६५० एकर मध्ये पसरलेला परिसर असो या परिसरात आज कागदाचा एक तुकडा देखील पडलेला दिसत नाही. स्वच्छता,शिस्त,पारदर्शीपणा आणि प्रसन्न वातावरण* या तत्वांवर त्यांनी संस्थानचा कारभार सांभाळला.
शेगांव संस्थानचे भक्त निवासाच्या खोल्या या पंचतारांकित हॉटेल्सना लाजवतील अशा सुंदर-स्वच्छ आहेत. अवध्या पंधरा रुपयांमध्ये आनंदसागर पाहता येते. आनंदसागरची संपूर्ण संकल्पना शिवशंकरभाऊ यांनी उभी केली. महाराष्ट्राच्या धार्मिक स्थळांसोबत मुख्य पर्यटन स्थळ म्हणून आनंदसागरचा उल्लेख केला जातो. विदर्भाच्या सांस्कृतिक अस्मितेत मानाचा तुरा खोवण्याचं केलेलं काम हे प.पू.शिवशंकर भाऊंचीच कमाल आहे. आनंदसागरमध्ये रुपया आणि रुपयांचा जमाखर्च लिहून ठेवण्यात येतो.
संस्थानमार्फत ४२ पेक्षा अधिक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. आजूबाजूच्या १००० गावांमध्ये वैद्यकिय सेवा पुरवण्यात येतात. सामान वाहणाऱ्या
ट्रॉलीपासून ते आपात्कालीन सुविधापर्यन्त सर्व गोष्टींनी आत्याधुनिक परिसर म्हणून शेगांवचा परिसर ओळखला जातो.
आज विदर्भात पाण्याचा प्रश्न भेडसावतो मात्र शेगांव नगरपरिषदेला ७ कोटी ७७ लाख रुपये दिल्यामुळे आज शेगांवची नळयोजना सुरू होवू शकली. ते काम देखील शिवशंकर भाऊ यांच्या निर्णयांमुळे झाले. शेगांव संस्थानचा उल्लेख आज जगभर होत असतो, सांगली कोल्हापूर येथे झालेल्या पुरामध्ये त्यांनी एक कोटींचा धनादेश दिला. आज भारतभरातील देवस्थानाच्या, संस्थानांच्या बाजारूपणामुळे देवांच्या सिंहानसापासून संपुर्ण देवच सोन्याचे झाले. सोन्या चांदीने देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करण्यात येतो, अशा वेळी मंदिर परिसर उभारणारे आणि अडल्यानडलेल्यांना मदत करुन एक आदर्श असे संस्थान उभे करणारे प.पू.शिवशंकरभाऊ पाटील माणसातल्या देवाप्रमाणेच होते.